"राजकारणाचा हा कसला खेळ......? चेहऱ्यांवर लोकशाही, हातात मात्र माचिसची पेटी"....!
City News Mumbai••72 व्ह्यूज•4 मिनिट वाचा
रविवार विशेष लेख.... एक परखड भाष्य.. (अनंत मनोहर नलावडे. 7738497259)
"गेल्या आठवड्यात मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला "दांडी" मारून पुन्हा एकदा शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी,मनसे युवा नेते अमित ठाकरेंचा संताप, मोदींच्या तसबिरीवरून पेटलेले राजकारण आणि त्यानंतरचे आरोप-प्रत्यारोप... आठवडाभरात महाराष्ट्राने राजकारणाचे अनेक रंग पाहिले.मात्र प्रश्न एवढाच आहे तो म्हणजे जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांना आता एकमेकांवर कुरघोडी करण्यातच अधिक रस उरला आहे का... याचा.....?
खरंतर राजकारणात नेहमीच मतभेद असतात,संघर्ष असतो,आरोप-प्रत्यारोपही असतात.पण जेव्हा जनतेच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा राजकीय अहंकार मोठा होतो, तेव्हा लोकशाहीचा कस लागतो.गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात घडलेल्या अशाच काही घटनांनी नेमका हाच प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.कारण एका बाजूला सत्तेच्या केंद्रातल्या हालचाली, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटापासून सुरू झालेला राजकीय वाद आणि त्यातून थेट पक्षीय संघर्षापर्यंत पोहोचलेले वातावरण या सगळ्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला आरसा दाखवला आहे.
कारण शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री व महायुती सरकारचे एक मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे अचानक दिल्लीला जाणे तेही मंत्रिमंडळ बैठक सोडून हीदेखील राजकीय चर्चेची ठिणगी ठरली.आता नेत्यांची दिल्लीवारी काही नवीन नाही.मात्र अशा भेटींचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यास तर्क-वितर्कांना उधाण येते.कारण राजकारणात सत्तेच्या समीकरणात प्रत्येक हालचालीला एक अर्थ असतो. त्यामुळे अशा पारदर्शकतेचा अभाव हा अफवांना खऱ्या अर्थाने खतपाणी घालत असतो....
अशात नेमक्या त्याचवेळी पुण्यातील शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील निकृष्ट भोजनाचा प्रश्न पुढे आला. विद्यार्थ्यांनी आग्रह धरल्यानंतर मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी संस्थेला भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा मुद्दा खरा तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण भोजनाचा होता.परंतु त्याच भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसबिरींच्या शेजारी लावलेली दिसली आणि त्यातून नवा वाद पेटला.कारण त्यातूनच तसबीर खाली उतरवण्याची घटना झाली आणि पुण्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न क्षणार्धात पक्षीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला.त्यातही पुण्यात प्रदेश भाजपच्या नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, प्रमुख कार्यकर्ते यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु असताना इकडे मुंबईत भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईत राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानावर मोर्चा काढला आणि वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले.मात्र प्रश्न पुन्हा तोच......विद्यार्थ्यांच्या ताटातील अन्नाचा प्रश्न कुठे गेला याचा......? यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अमित ठाकरे यांच्याबाबतच्या आक्रमक प्रतिक्रियेने तर वाद आणखी चिघळला.कारण जेंव्हा राजकीय मतभेदांना व्यक्तिगत पातळीवरील भाषेची जोड मिळाली की संघर्षाची धार वाढते..... पण त्यातून पक्षाची प्रतिष्ठा वाढते की राजकारणाची पातळी घसरते, हा विचार प्रत्येक नेतृत्वाने करायला हवा.
यासर्व वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर केलेल्या टिप्पणींनीही राजकीय वातावरण तापले.त्यात अमित ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने वादाला कायदेशीर वळण मिळाले.विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पण इथेच सगळ्यांनी थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज आहे.कारण इथे एक बाब प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे,सत्ताधाऱ्यांनी पोलिसी कारवाई म्हणजेच उत्तर समजू नये आणि विरोधकांनीही प्रत्येक कारवाईला राजकीय सूड म्हणण्याची घाई करू नये. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. तसबिरीचा मुद्दा असो, सरकारी संस्थेतील गैरव्यवस्था असो किंवा एखाद्या राजकीय नेत्याचे वक्तव्य......प्रत्येक बाबतीत कायद्याची चौकट आणि सार्वजनिक जबाबदारी दोन्ही समान असायला हव्यात हे सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मात्र या आठवड्याने आणखी एक गोष्ट दाखवली ती म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात प्रश्नापेक्षा प्रतीक मोठे आणि मुद्द्यापेक्षा प्रतिक्रिया मोठी होत चालली आहे.कारण विद्यार्थ्यांना वसतिगृह असो, आश्रमशाळा असो, एक एखादी प्रशिक्षण संस्था तिथे त्यांना चांगले जेवण मिळते की नाही, सरकारी संस्था व्यवस्थित चालतात की नाही, अधिकाऱ्यांवर नियंत्रण आहे की नाही याचे.मात्र सध्या खेदाने नमूद करावेसे वाटते सर्वच पक्षातल्या नेत्यांना या सर्वांपेक्षा कोणाची तसबीर कुठे आहे आणि कोणाने कोणाला काय म्हटले, यावर आपली राजकीय ऊर्जा खर्च करावीशी वाटते. त्यामुळे हे केवळ सत्ताधाऱ्यांचे अपयश नाही......;तर विरोधकही त्याला अपवाद नाहीत.कारण जनतेने नेत्यांना निवडून दिले ते एकमेकांवर घोषणाबाजी करण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी. महाराष्ट्राला आज मोर्चे, प्रतिमांचे राजकारण आणि सोशल मीडियावरील युद्धापेक्षा सरकारी वसतिगृहातील मुलांच्या ताटात चांगले अन्न, शिक्षणसंस्थांमध्ये शिस्त, प्रशासनात उत्तरदायित्व आणि राजकारणात संयम हवा आहे.आता राजकारणात संघर्ष हवाच.....; पण तो विचारांचा असावा, व्यक्तींचा नाही. आक्रमकता हवी......; पण ती जनतेच्या प्रश्नांसाठी असावी.आणि सत्ता असो वा विरोधक......कायद्याच्या चौकटीपलीकडे कुणीही जाऊ नये याचेही भान सर्वांनी ठेवायलाच हवे..... कारण गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राने अनेक नेत्यांना बोलताना पाहिले. आता जनतेला त्यांचे काम करताना पाहायचे आहे.कारण शेवटी तसबिरी उतरवून, मोर्चे काढून, एफआयआर दाखल करून किंवा एकमेकांवर आरोप करून विद्यार्थ्यांच्या ताटातला घास सुधारत नाही.तर तो सुधारतो जबाबदार प्रशासनाने आणि त्या प्रशासनाला जाब विचारणाऱ्या जबाबदार राजकारणाने. अनंत मनोहर नलावडे..... 7738497259