"काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो अन् आपण आंदोलन करतो"...; रवींद्र चव्हाणांचा युवा मोर्चाला भर बैठकीत खडे बोल...!
पुण्यातील वसतिगृहाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाने भाजपच्या घरातच खळबळ......
मुंबई, दि. 2(अनंत नलावडे )- पुण्यातील ज्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट भोजनाचा प्रश्न थेट राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांवरून भाजपच्या युवा मोर्चालाच खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी जाहीर घरचा आहेर दिला.त्या विद्यार्थ्यांनी आपल्या भोजनाच्या प्रश्नासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे धाव घेतल्यानंतर ठाकरे यांनी वसतिगृहात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.त्याचवेळी अधीक्षकांच्या खुर्चीमागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसबिरींसोबत लावलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरवल्याने राजकीय वादाला अचानक तोंड फुटले.
मात्र या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आक्रमक आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाची पद्धतच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नाराजीचे कारण ठरली.त्यामुळे बुधवारी मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी या प्रकारावर तीव्र नापसंती व्यक्त करत युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी चांगलेच कानही उपटले.अनं नेमके बोलण्याच्या नादात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा तोल ढसळला आणि त्यांच्या वक्तवव्याने आणखी नव्या वादाला तोंड फोडले.
"काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो अन् आपण आंदोलन करतो"...!
विरोधकांकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून एखादे वक्तव्य झाले की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लगेच रस्त्यावर उतरण्याची भूमिका योग्य नाही, असे चव्हाण यांनी सुरुवातीला स्पष्ट केले.मग त्यांनी बोलण्याच्या ओघात “काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो अन् आपण आंदोलन करतो...” अशा शब्दांत त्यांनी युवा मोर्चाच्या अति-उत्साही भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आता चव्हाण यांच्या या वक्तव्याचा थेट संदर्भ अमित ठाकरे यांच्या मुद्द्यावरून करण्यात आलेल्या आंदोलनाशी असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले.त्याचवेळी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनीही प्रत्येक राजकीय वक्तव्याला आंदोलनाने उत्तर देण्याऐवजी अभ्यास, विचारधारा, संघटन आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचा प्रश्न नेमका कुठे हरवला.....?
या संपूर्ण वादाची सुरुवात मात्र राजकीय नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या ताटातील जेवणाच्या प्रश्नाने झाली होती.पुण्यातील नामांकित शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोज दुपारी व रात्रीचे निकृष्ट भोजन मिळत असल्याची तक्रार घेऊन विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांनी प्रत्यक्ष वसतिगृहात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत भोजनाच्या गुणवत्तेबाबत जाब विचारला.याच भेटीदरम्यान अधीक्षकांच्या खुर्चीच्या मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसबिरींच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर लावलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यावरून प्रश्न उपस्थित होत असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी मोदींची तसबीर खाली उतरवली.त्यानंतर हा प्रकार विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या प्रश्नापलीकडे जाऊन थेट राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला.
मोदींच्या तसबिरीवरून आंदोलन.....; मात्र चव्हाणांनीच लावला ब्रेक.....?
मोदींच्या तसबिरीच्या मुद्द्यावरून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाने भाजपच्या आक्रमक भूमिकेची छाप निर्माण केली असली, तरी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्याच भूमिकेवर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्याचेही बुधवारीच्या बैठकीतून दिसून आले."मला युवाशक्तीला अडचणीत आणायचे नाही.आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड म्हणून तयार करायचे नाही,” असे स्पष्ट शब्दांत जाहीर तंबी देत चव्हाण यांनी युवा कार्यकर्त्यांना संयमाचाही धडा दिला.मात्र आता राजकीयदृष्ट्या पाहता, हा वाद मोदींच्या तसबिरीपुरता मर्यादित राहिलेला नाही.तर एका बाजूला विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न, दुसऱ्या बाजूला मनसेचा आक्रमक हस्तक्षेप आणि त्यावर भाजप युवा मोर्चाची प्रतिक्रिया या तीन टप्प्यांतून वाद वाढला.मात्र, या प्रतिक्रियेलाच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी बैठकीत खडे बोल सुनावल्याने आता "आक्रमक आंदोलन की संयमी संघटन".....? हा भाजपच्या युवा राजकारणातील नवा प्रश्न पुढे आला आहे. ............................. (समाप्त)...........