मराठवाड्याचा दुष्काळ होणार आता इतिहासजमा.......? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतिकारी घोषणा........!
City News Mumbai••0 व्ह्यूज•2 मिनिट वाचा
शिवाय धाराशिव-बीड-लातूरला पाणी पोहोचविण्याचीही मोठी घोषणा......
मुंबई, दि.17(अनंत नलावडे)-मराठवाड्याच्या पिढ्यान्पिढ्यांच्या दुष्काळाच्या प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.“या पिढीने भोगलेला दुष्काळ पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त ३० टीएमसी पाणी भीमा खोऱ्यामार्गे धाराशिव, बीड आणि लातूरला आणण्याची, तसेच उल्हास खोरे आणि कोकणातून समुद्राकडे वाहून जाणारे ७० टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची घोषणाही त्यांनी केली.या योजनांच्या माध्यमातून पुढील सात वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बंदुकीच्या तीन फैरींची मानवंदना देण्यात आली आणि शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले.यावेळी फडणवीस यांनी विभागाच्या विकासाचा व्यापक आराखडाच मांडला.
त्यात त्यांनी पाणीप्रश्नासोबत आरोग्य आणि उद्योगालाही गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे चित्र या घोषणांमधून पुढे आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ७१० कोटी रुपयांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत, धाराशिवमध्ये ५०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय व मेडिकल कॉलेज, तर परळी येथे ५६५ कोटी रुपयांचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे.तर औद्योगिक क्षेत्रात शेंद्रा-बिडकीन आणि डीएमआयसी परिसराला ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे मोठे केंद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, टोयोटा, जेएसडब्ल्यू आणि एथरसारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी आणखी ८ हजार एकर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट केले.त्याचवेळी जालना ड्रायपोर्ट, सुमारे ३५०० कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प आणि छत्रपती संभाजीनगरमधील सर्वांत लांब उन्नत मार्गामुळे दळणवळणाच्या पायाभूत सुविधांनाही चालना मिळणार असल्याचेही ठळकपणे स्पष्ट केले
दरम्यान, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही देताना ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला. मोफत विजेसोबतच ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले रद्द केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शहराच्या पाणीप्रश्नावरही सरकारने आश्वासन दिले असून छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक घराला लवकरच दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
मराठवाड्याच्या पाणीकारणाला नवा वळणबिंदू......?
मराठवाड्याचा दुष्काळ हा केवळ पावसाचा नव्हे, तर पाण्याच्या उपलब्धतेचा आणि त्याच्या नियोजनाचा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे कृष्णा खोरे, भीमा खोरे, कोकण-उल्हास आणि गोदावरी खोरे यांना जोडण्याच्या घोषणेने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. मात्र ३० टीएमसी आणि ७० टीएमसी पाणी प्रत्यक्षात कधी, कोणत्या प्रकल्पातून आणि कोणत्या कालमर्यादेत मराठवाड्यात पोहोचणार, यावरच या घोषणेची प्रत्यक्ष परिणामकारकता अवलंबून राहणार आहे. ............................(समाप्त)........